'डान्स इंडिया डान्स' या रिअॅलिटी शोचा पहिला सीझन २००९ मध्ये आला होता. तेव्हापासून आता १७ वर्षे झाली आहेत आणि आतापर्यंत त्याचे ७ सीझन आणि अनेक 'स्पिन-ऑफ' आले आहेत. या डान्स रिअॅलिटी शोने राघव जुयाल, धर्मेश, पुनीत पाठक आणि शक्ती मोहन यांसारखे प्रसिद्ध चेहरे दिले, तर दुसरीकडे अनेक स्पर्धक लोकांच्या नजरेतून गायब झाले. अनेकांना डान्सची आवड होती, पण कोणाला घराची परिस्थिती तर कोणाला जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींमुळे आपल्या स्वप्नांचा बळी द्यावा लागला. असाच एक स्पर्धक होता, जो 'डान्स इंडिया डान्स'च्या चौथ्या सीझनमध्ये दिसला होता. त्याने आपल्या डान्सने परीक्षकांनाही प्रभावित केले होते, पण आज तो समोसे आणि कचोरी विकत आहे. या स्पर्धकाचं नाव श्याम नाथ गोस्वामी आहे. घरची परिस्थिती अशी होती की, श्याम नाथ गोस्वामीला डान्सर आणि कोरिओग्राफर बनण्याचं स्वप्न सोडावं लागलं आणि वडिलांना मदत करण्यासाठी समोसे-कचोरीचा विकावी लागली. श्याम नाथने लहानपणापासूनच खूप गरीबी पाहिली होती. श्याम नाथ गोस्वामीने एकदा 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला सांगितलं होतं की, हैदराबादमध्ये त्याचं एक घर होतं आणि वडील समोसे विकायचे. त्याचं काम बटाटे सोलणं आणि ग्राहकांना पाणी देणं हे असायचं. दुकानातून फार मोठी कमाई होत नव्हती, पण घर चालेल इतके पैसे मिळायचे. जेव्हा तो सहावीत होता, तेव्हा घरात पहिल्यांदा टीव्ही आला आणि तेव्हा पहिल्यांदाच 'डान्स इंडिया डान्स' सारख्या रिअॅलिटी शोबद्दल माहिती मिळाली. "मी डान्सर्स आणि त्यांच्या स्टेप्स पाहून पूर्णपणे भारावून गेलो होतो. मलाही तिथे जावेसं वाटायचं. मी रात्रभर जागून DID बघायचो आणि रात्री २ वाजेपर्यंत सराव करायचो. शाळेतून आल्यावर मी इंटरनेट कॅफेमध्ये जायचो, फक्त YouTube वर डान्स व्हिडिओ पाहण्यासाठी, आणि मग एकटाच सरावासाठी छतावर पळायचो. जेव्हा मी १९ वर्षांचा होतो, तेव्हा मला कळलं की जवळच DID चं ऑडिशन होत आहेत, म्हणून मी कोणालाही न सांगता कॉलेज बुडवलं आणि ऑडिशनला गेलो. ५ तासांनंतर, अखेर मला संधी मिळाली. मी माझ्या खास 'टॉलिवूड' स्टाईलमध्ये ३० सेकंदांचा परफॉर्मन्स दिला आणि माझी निवड झाली." "पहिल्याच दिवशी लोकल ट्रेनमध्ये माझी बॅग आणि फोन चोरीला गेला आणि मी फक्त एक जोडी कपड्यांच्या जोरावर बोरीवली स्टेशनवर झोपून रात्र काढली. जेव्हा माझी पाळी आली, तेव्हा मी इतका थकलो होतो की टीव्ही राउंड ऑडिशन पास होऊ शकलो नाही. परीक्षकांनी सांगितलं की तुम्ही डान्स चांगला करता, पण तुम्हाला अधिक सरावाची गरज आहे. मला वाटलं की एका मिनिटात सर्व काही संपलं, पण जेव्हा माझे ऑडिशन व्हिडीओ ऑनलाईन व्हायरल होऊ लागले, तेव्हा लोकांच्या मागणीमुळे मला परत बोलावण्यात आलं. त्यांनी माझ्यासोबत एक एपिसोड शूट केला, पण तो कधीच प्रसारित झाला नाही" असं सांगितलं. जेव्हा श्याम नाथ घरी परतला तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्याच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला, त्यानंतर घराची सर्व जबाबदारी श्याम नाथच्या खांद्यावर आली. श्यामचे आई-वडील पूर्णपणे खचले होते. परिस्थिती अशी होती की श्याम त्यांना एकटं सोडू शकत नव्हता. आपल्या स्वप्नांचा चक्काचूर करून श्याम पुन्हा समोसे-कचोरीच्या दुकानात परतला आणि आजही तेच दुकान सांभाळत आहे. आता १२ वर्षे झाली आहेत.
'डान्स रिअॅलिटी शो'पासून'स्ट्रीट फूड'पर्यंतः'द अनलॉकी स्टोरी ऑफ श्याम नाथ गोस्वामी'
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.