जागतिक इंधन-ऊर्जा संकटः सहा देशांनी इराणच्या होरमुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्याचा निषेध केला
Todays Maharashtra Breaking News Live Updates in Marathi:अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना कूटनीतीने उत्तर देत, इराणने होर्मुझ सामुद्रधुनी रोखल्याने अनेक देशांमध्ये इंधन-ऊर्जासंकट निर्माण झालं आहे. याची गंभीर दखल घेऊन ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड्स आणि जपान हे सहा देश एकत्र आले असून त्यांनी इराणला तंबी दिली आहे. युद्धाच्या झळा कमी होण्याची चिन्हं नसताना, इस्रायलने अमेरिकेला युद्धात ओढल्याचा दावाबेंजामिन नेतन्याहूयांनी फेटाळून लावला आहे. या युद्धामुळे भारतात निर्माण झालेली एलपीजी टंचाई आणि गॅस सिलिंडरसाठी लागलेल्या रांगा काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र, व्यावसायिकांना सिलिंडरसाठी अजूनही आटापिटा करावा लागतोय. महाराष्ट्रात अशोक खरात लैंगिक छळ प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. त्याचे पडसाद विधिमंडळात उमटण्याची शक्यता आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातराज ठाकरेयांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारलाही टीकेचं लक्ष्य केल्यानं मनसे विरुद्ध भाजपा असा संघर्षही पाहायला मिळू शकतो. युद्ध आणि अमेरिकेतील अर्थकारण यामुळे कोसळलेला शेअर बाजार पुन्हा कधी आणि कसा सावरणार, याची काळजी गुंतवणूकरादांना आहे. दुसरीकडे, आयपीएलचे वारे वाहू लागले असून क्रिकेटचाहत्यांना रनसंग्रामाचे वेध लागले आहेत. या आणि अशा महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या गारपिटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून, एका शेतकऱ्याच्या तब्बल तीन एकर केसर आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. गारांच्या तडाख्यामुळे झाडांवरील बहुतांश आंबे खाली पडले असून, उरलेल्या फळांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण बाग होत्याची नव्हती झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय जयंत चौधरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चौधरी यांच्या टीमकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. एका भारतीय मोबाईल क्रमांकावरून कॉल आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. Union MoS Jayant Chaudhary has received a death threat. Police have received a complaint from his team, and it is being examined. The threat call was made from an Indian number: Delhi Policepic.twitter.com/PG8ELpLqxi सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत भाजपचे तोडफोडीचे राजकारण व 'ऑपरेशन लोटस' यशस्वी झाले. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिंदेसेनेचे ३५ चे बहुमत असतानाही भाजपाच्या तोडफोडीच्या राजकारणाने त्यांचा पराभव झाला. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रिया शिंदे यांची आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. विशेष म्हणजे प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला आहे. लिंबागणेश परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतातील कलिंगड, आंबा आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोखरी घाट येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिंगड पिकाला सर्वाधिक फटका बसला असून, ऐन बहरात आलेले पीक पूर्णपणे वाया गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे वक्तव्य पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जिल्हा परिषदेत आल्यानंतर केले आहे. या वक्तव्यामुळे भाजपला बाजूला ठेवून ही निवडणूक होणार असल्याची चर्चा साताऱ्यात रंगू लागली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरात प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. रुपाली चाकणकर यांच्याविरोधात आता पक्षातीलच रुपाली पाटील ठोंबरे आक्रमक झाल्या आहेत. रुपाली पाटील ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर या फरार झाल्या असल्याचा दावा केला आहे. संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आलेला असताना, धुळे शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. साक्री तालुका आणि शिंदखेडा तालुक्यात गारपीट झाल्याने काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असून वादळी वाऱ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके आडवी पडली आहेत. रुपाली चाकणकरांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. चाकणकर आणि खरात याचे आर्थिक संबंध होते. ईडीने चाकणकरांच्या उत्पन्न स्त्रोताची चौकशी केली पाहिजे. या प्रकरणात सहआरोपी करून चाकणकरांना अटक झाली पाहिजे. चाकणकरांच्या खरात याच्या गुन्ह्याची माहिती होती असा आरोप उद्धवसेनेच्या नेते सुषमा अंधारे यांनी केला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यात झालेल्या गारपिटीचा फटका द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. तुफानी गारपिटीमुळे द्राक्षांचे घड अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. भिवघाट, करंजे, बानूरगड, पळशीसह आसपासच्या गावांमध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "गृहमंत्र्यांच्या बुडाखाली अंधार पसरलाय, वरपासून खालपर्यंत गृह विभागातील अधिकारी-कर्मचारी भोकं पाडून लुटायला बसलीत", असे सपकाळ म्हणाले. "देवेंद्र फडणवीस यांच्यातील गृहमंत्र्यांना आपल्या विभागावर वचक ठेवता येत नसेल तर त्यांनी रात्री अपरात्री हूडी घालून पोलिस स्टेशन्सच्या दौऱ्यावर निघायलाच हवे. हे वाचल्यानंतर हुडी घालून पंत दौऱ्यावर जाण्याचा विचार ही करतील कारण त्यांना आपल्या कलागुणांचा वापर करण्याची सवय आहेच. पण त्यांचेच हात या भ्रष्टाचारात जर बरबटलेले असले तर…? मुख्यमंत्री / गृहमंत्र्यांचीच जर या भ्रष्टाचारात टक्केवारी ठरली असेल तर भ्रष्टाचारमुक्त राज्य निर्माण करण्याची अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची?", असा सवाल सपकाळ यांनी केला आहे. जालना जिल्ह्यात काल ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानुसार काल दुपारनंतर ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून, जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दाभाडीसह धनसावंगी तालुक्यातील रांजणी या ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. तर परतूर मंठा जालना शहरासह जाफराबाद तालुक्यात मुसळधार तर रिमझिम स्वरूपचा पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेला गहू ज्वारी मका पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. "सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की, मी जिवंत आहे आणि तुम्ही सगळे यांचे साक्षीदार आहात. याचसोबत मी सर्व फेक न्यूज फेटाळून लावत आहे", असे विधान इस्रायल पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी केले. सोशल मीडियावर नेतन्याहू इराणच्या हल्ल्यात मारल्या गेल्याच्या चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल सुरू झालेल्या चर्चांना उत्तर दिले. बीड जिल्ह्यात कालपासून अवकाळीने कहर केला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि गारांचा पाऊस. यामुळे फळबागा व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.. बीड जिल्ह्यातील आष्टी, केज तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल झालेल्या गारपिठीमुळे डोंगरदऱ्यामध्ये गारांचा खच पाहायला मिळत आहे.तब्बल दोन ते तीन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. यांचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. नाशिकमधील भोंदू अशोक खरात यांची कृत्ये समोर आल्यानतर राज्यात खळबळ उडाली आहे. विशेषतः रुपाली चाकणकर यांचे या खरातसोबत चांगले संबंध असल्याची चर्चा आहे. चाकणकर आणि खरात यांचे अनेक फोटो व्हायरल झाले असून, त्यातील काही फोटो शेअर करत अंजली दमानियांनी रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.