Achira News Logo
Achira News

तारगोलांच्या प्रदूषणामुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील परिसंस्थेला धोका

Maharashtra Times
तारगोलांच्या प्रदूषणामुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील परिसंस्थेला धोका
Full News
Share:

अमुलकुमार जैन, रायगड:पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच समुद्रकिनाऱ्यावर चिंताजनक चित्र समोर आले आहे. समुद्रातून वाहून आलेले लहान-लहान डांबराचे गोळे ( टार बॉल्स ) मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर साचत असून, यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. किनाऱ्यावर ठिकठिकाणी दिसणारे हे काळे डाग सागरी प्रदूषणाचे स्पष्ट संकेत देत आहेत. भरतीसोबत येणारे हे डांबराचे गोळे वाळूत पसरत असून, काही ठिकाणी त्यांचे थरही साचलेले दिसून येतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत या प्रकारात वाढ झाली असून, किनारपट्टीवर प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. वाढत्या दुर्गंधीमुळे पर्यटकांनी पाठ फिरवली असून, किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिक रहिवासी आणि निसर्गप्रेमींमध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे.टार बॉल्स कसे तयार होतात?तज्ज्ञांच्या मते, टार बॉल्स साधारणपणे समुद्रातील तेलगळती (oil spill), जहाजांमधून सोडलेले इंधन व कचरा, तसेच औद्योगिक सांडपाणी यामुळे तयार होतात. समुद्रातील तेल लाटांमुळे घट्ट होऊन लहान गोळ्यांमध्ये रूपांतरित होते आणि भरती-ओहोटीच्या प्रक्रियेमुळे हे गोळे किनाऱ्यावर येऊन साचतात. या प्रदूषणाचा थेट परिणाम सागरी जीवसृष्टीवर होत असून, मासे, खेकडे तसेच इतर समुद्री जीवांना धोका निर्माण होतो. तसेचमच्छिमारांच्या उपजीविकेवरहीयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर फिरणाऱ्या पर्यटकांसाठीही हे डांबराचे गोळे त्रासदायक ठरत असून, त्वचेला चिकटणे किंवा आरोग्याच्या तक्रारी निर्माण होण्याचा धोका नाकारता येत नाही.प्रदूषणाबाबत चिंतास्थानिक नागरिकांनी या वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. किनारपट्टी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविणे, प्रदूषणाच्या मूळ कारणांचा शोध घेणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. समुद्राची ही ‘काळी भेट’ भविष्यात मोठ्या संकटाचे रूप धारण करू नये, यासाठी वेळीचउपाययोजनाकरणे अत्यावश्यक असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तारगोलांच्या प्रदूषणामुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावरील परिसंस्थेला धोका | Achira News